अहमदनगर एज्युकेशन सोसायटीचे पारनेर येथील सेनापती बापट विद्यालयात सायंक्रीडा मंडळाचा शुभारंभ !

संस्थेच्या माध्यमातून व क्रीडा शिक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पारनेर मध्ये अनोखा क्रिडाउपक्रम !


पारनेर प्रतिनिधी : श्रीकांत चौरे

            अहमदनगर एज्युकेशनच्या सेनापती बापट या विद्यालयाच्या माध्यमातून व क्रीडा शिक्षक श्री.सुनील गायकवाड सर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या सुट्टीनंतर विविध प्रकारचे मैदानी खेळांचा सराव व शारीरिक व्यायाम विद्यार्थ्यांकडून व्हावा हा मानस ठेवत श्री.सुनील गायकवाड यांनी सायंक्रीडा मंडळाची स्थापना केली आहे.

          सायंक्रीडा मंडळाच्या शुभारंभ प्रसंगी सदर समारंभाचे अध्यक्षस्थान शिक्षक नेते,निवृत्त शिक्षक रा.या.औटी यांनी भुषवीले तर समाजातील विविध क्षेत्रात आपल्या कर्तुत्वाने प्रसिद्ध झालेले सामाजिक कार्यकर्ते विजय डोळ ,नगरसेवक युवराज पठारे यांच्यासह अनेक माजी विद्यार्थी यावेळी उपस्थित होते .

            देशाचे भविष्य समजल्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व क्रीडा उपक्रमाच्या माध्यमातून शारीरिक व बौद्धिकतेला प्रेरणा देण्यासाठी अहमदनगर एज्युकेशन सोसायटीचे सेनापती बापट विद्यालय पारनेर येथे नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत असतात.विद्यार्थ्यांच्या बौद्धिक शारीरिक व क्रीडा क्षेत्रातील या त्रिसूत्री शिक्षणाच्या माध्यमातून ज्ञानदानाचे खरे विद्यापीठ म्हणजे शाळा ही ओळखली जाते.प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यात कलाटणी देणारी गावपातळीवरील संस्था ही शाळा असते.प्रत्येकाचा बौद्धिक,शारीरिक,मानसिक, भावनिक विकास हा खऱ्या अर्थाने मराठी माध्यमाच्या शाळेत होत असतो. आणि या मध्ये क्रीडाशिक्षक व ईतर शिक्षकांची भूमिका महत्वाची असते.असे प्रतिपादन अध्यक्षपदावरून शिक्षक नेते रा.या.औटी यांनी केले.

           यावेळी बोलताना पारनेर तालुका तालीम संघाचे अध्यक्ष तथा पारनेर नगरपंचायतचे नगरसेवक श्री.युवराज पठारे म्हणाले की,हल्लीच्या इंटरनेट व मोबाईलच्या विळाख्यात तरुण पिढी पूर्णपणे गुंतून पडली आहे.त्यामुळे विविध शारीरिक व्याधींपासून मुक्त होण्यासाठी चोवीस तासापैकी एक तास तरी वेळ प्रत्येकाने आपला आरोग्या साठी द्यावा. मैदानी खेळामुळे खेळाडू व्यसनाच्या आहारी जात नाही.सुदृढ निरोगी आयुष्य जगण्यासाठी तो स्वतःचा स्वतःच शिल्पकार ठरतो.असे सांगत युवराज पठारे यांनी विद्यार्थ्यांना व्यायामाचे व खेळाचे महत्व पटवून दिले .

             आपल्या मनोगतात पारनेर शहराचे माजी उपसरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते ,श्री.विजयराव डोळ आपल्या मनोगतात म्हणाले की,सायंक्रीडा मंडळ ही या वि‌द्यालयाची परंपरा आहे.गेले अनेक वर्षात क्रीडा शिक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात नाविन्यपूर्ण यश मिळवले आहे.मी स्वतःही या विद्यालयातील सायंक्रीडा मंडळामुळे घडलो आहे. खेळामु‌ळे सांघिक भावना विद्यार्थ्यांना भविष्यात सामाजिक व्यवसायिक किंवा राजकीय क्षेत्रात आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटविण्यासाठी व यशस्वी व्यक्तिमत्व घडविण्यासाठी फायद्याची ठरते.व त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये लढण्याची व व्यक्तीमत्व घडविन्याची वृत्ती तयार होऊन एक सकारात्मक ऊर्जा तयार होते.व आपले मन प्रसन्न राहत स्वतः मध्ये एक नविन आत्मविश्वास निर्माण होतो.तेव्हा तरुण विद्यार्थी मित्रांनी अभ्यासाबरोबर फावला वेळ मोबाईलवर व्यथित करण्यापेक्षा मैदानी खेळाकडे लक्ष द्यावे ,जेणेकरून त्यांचे आरोग्य व आत्मविश्वास वाढू शकतो असे प्रतिपादन श्री.डोळ यांनी केले .

          सदर कार्यक्रमाचे नियोजन संस्थेच्या प्रमुख कार्यवाह ,छायाताई फिरोदिया यांच्या संकल्पनेतून तसेच श्री.भूषण भंडारी व श्री.अनिल भंडारी यांच्या सहकार्यातून कबड्डी,खो-खो सह इतर मैदानी खेळांचा सराव या सायंक्रीडा मंडळाच्या माध्यमातून नविन खेळाडू तयार करण्यासाठी हा अनोखा उपक्रम राबवत त्याच्या यशस्वीतेसाठी क्रीडा शिक्षक श्री.सुनिल गायकवाड सह सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीम.रोहिणी शेळके यांनी केले.तर सर्व उपस्थित आजी, माजी विद्यार्थी व उपस्थित पालकांचे आभार,क्रीडा शिक्षक श्री.सुनील गायकवाड यांनी मानले .