बेघरांच्या मनामध्ये खा.निलेश लंकेंचे घर !
कळंबोली उड्डाणपुलाखाली वाढदिवस साजरा !
निलेश लंके मित्र मंडळ नवी मुंबईने जपली बांधिलकी !
पनवेल / प्रतिनिधी :-
अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. मात्र स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाले तरी आजही अनेक जण त्यापासून वंचित आहेत. कळंबोली येथील उड्डाण पुलाखाली आणि आजूबाजूला पोटाची खळगी भरण्यासाठी शेकडो बेघर राहतात. त्यांना शिक्षण देण्यासाठी ओपन एज्युकेशन संस्था प्रयत्न करत आहे. अगदी याच ठिकाणी शनिवारी खासदार निलेश लंके यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे लंके यांनी ऑनलाइन संबंधितांशी संवाद साधत त्यांच्या मनामध्ये एक प्रकारे घर निर्माण केले. या माध्यमातून निलेश लंके मित्र मंडळ नवी मुंबईच्या वतीने खऱ्या अर्थाने सामाजिक बांधिलकी जपण्यात आली.
भारत हा महासत्तेचे स्वप्न पाहत असताना तसेच एकविसाव्या शतकात आपण सर्वजण वावरतोय, आजही समाजामध्ये 'आहे रे' आणि 'नाही रे' अशा प्रकारची दरी आहे. आजच्या घडीला या मूलभूत गरजा ही अनेकांना पूर्ण करता येत नाहीत. त्यासाठी त्यांना वणवण फिरावे लागते. पोटाची खळगी भरण्यासाठी समाजातील कित्येकांना आजमितीलाही तारेवरची कसरत करावी लागते. अनेकदा लहान मुलांचा आधार घ्यावा लागतो. पनवेल सारख्या नागरी वसाहतींमध्ये डोंबाऱ्याचा खेळ करून काही कुटुंब दोन वेळचे अन्न मिळवण्यासाठी कसरत करतात. त्यांच्या पोटी जन्म घेतलेल्या मुलं आणि मुलींचे खेळण्या-बागडण्याच्या त्याचबरोबर शिक्षण घेण्याचे वय असताना त्यांना सुद्धा तारेवरची कसरत करून उपस्थितांना जिंकून घ्यावे लागते. तरच त्यांच्या ताटामध्ये दोन घासाचे पैसे पडतात.या मुलांसाठी डॉ. योगेंद्र कोलते व अनिता कोलते यांनी कळंबोली उड्डाणपुलाखाली बिनभिंतीची शाळा सुरू केलेली आहे. या ठिकाणी या मुलांना लिहिण्या वाचण्याचे धडे दिले जातात. जनसामान्यांसाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून कोरोना मध्ये काम करणारे खासदार निलेश लंके यांची सामाजिक महती सर्व दूर पोहोचलेली आहे. पनवेल परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात मुंबई स्थित पारनेर आणि नगरकर राहतात. त्यांच्या हितासाठी सुद्धा खा. लंके हे सातत्याने काम करीत आहेत. दरम्यान 10 मार्च रोजी त्यांचा वाढदिवस असल्याने त्या निमित्ताने कळंबोली उड्डाण पुलाखालील बिन भिंतीच्या शाळेमध्ये त्यांचा जन्मदिवस साजरा करण्याचा संकल्प खासदार निलेश लंके मित्र मंडळ नवी मुंबईच्या वतीने करण्यात आला. त्यानुसार शनिवारी या बेघर असलेल्या मुलांसोबत केक कापून आनंद व्यक्त करण्यात आला. विशेष म्हणजे खा. लंके यांनी या मुलांची ऑनलाइन पद्धतीने संवाद साधला. सर्वांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. या कार्यक्रमाला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पनवेल विधानसभा संघटक दीपक निकम, मनपाचे माजी आरोग्य निरीक्षक दौलत शिंदे, सामाजिक कार्यकर्ते गोरखशेठ आहेर, उद्योजक दिलीपशेठ कोरडे, सुरेश धवन, दिनेश घोलप, सचिन गोडसे, निलेश शिंदे, अमोल बोडके, विठ्ठल गलांडे, सचिन गायकवाड, गोपीनाथ पठारे, अविनाश कोंडिलकर, शिवाजी वाफारे, तुळशीराम बोरुले यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते
चौकट
आभाळ पांघरू अन् दगड उशाला !
उद्याच्या भाकरीची काळजी कशाला, आभाळ पांघरु अन दगड उशाल, फाटकी झोळी फुटकी थाळी, आमच्या सारखे आम्हीच असु कशाला हवी रोटी कपडा आणि मकान, नको पढाई लिखाई अन दवाई ढम ढम ढोल वाजे, झननं झननं झाजंनी नाचतो डोंबारी रे नाचतो डोंबारी,” या काव्य प्रमाणे दिवसभर पनवेल परिसरात दोरीवर कसरत करून रात्रीच्या वेळी कळंबोली उड्डाणपुलाखाली आणि बाजूच्या पदपथावर विसावा घेणाऱ्या डोंबारी समाजाच्या मुलांबरोबर खासदार निलेश लंके यांचा वाढदिवस साजरा करून त्यांच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या मित्र मंडळाच्या वतीने खऱ्या अअर्थाने माणुसकी आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला.
अंधारातील भविष्याचा उजेड संकल्प !
मुंबईच्या प्रवेशद्वारावर म्हणजेच पनवेल परिसरात त्याचबरोबर ठीक ठिकाणी बेघर असणाऱ्या कुटुंबातील मुलांचे भविष्य उजेडात आणण्याच्या अनुषंगाने यापुढे प्रयत्न करणार असल्याची ग्वाही अहिल्यानगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांनी दिली. या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे अनुषंगाने आपण केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचेही ते म्हणाले. कोलते दांपत्य खऱ्या अर्थाने तळागाळातील लोकांसाठी स्वतःला झोकून देऊन काम करत असल्याचे गौरवोद्गारही खा. लंके यांनी ऑनलाइन संवाद साधताना काढले.

0 Comments
Jansamvad News covers latest marathi news (Tajya Batmya), live updates, online from Mumbai, pune, satara, Kolhapur, Solapur, Sangli,Nashik,thane, Raigad, kokan, west Maharashtra, nagpur and all Maharashtra